जेवणात अळ्या आणि उंदराच्या लेंड्या! वलखेड फाटा येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहातील धक्कादायक प्रकार

सूर्योदय वृत्तसेवा|जालना

 

अंबड तालुक्यातील वलखेडा येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. वसतिगृहातील जेवणात चक्क अळ्या, किडे आणि उंदराच्या लेंड्या आढळल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पिण्याचे अस्वच्छ पाणी, निकृष्ट जेवण आणि वसतिगृहातील इतर अनेक असुविधांना कंटाळून सुमारे ३५ विद्यार्थिनींनी थेट अंबडच्या तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल करत न्याय देण्याची मागणी केली आहे.

गेल्या वर्षभरापासून विद्यार्थिनी या वसतिगृहात राहत असून त्यांना दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात वसतिगृहाच्या वॉर्डनकडे अनेकदा तक्रारी करूनही परिस्थिती बदललेली नाही. तक्रार केल्यावर केवळ दोन-तीन दिवस सुधारणा होते आणि त्यानंतर पुन्हा नेहमीप्रमाणेच अनागोंदी कारभार सुरू होतो, अशी उद्विग्नता विद्यार्थिनींनी या निवेदनात व्यक्त केली आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात विद्यार्थिनींनी वसतिगृहातील एकूण २१ गंभीर त्रुटी प्रशासनासमोर मांडल्या आहेत. यात प्रामुख्याने अन्न आणि आरोग्याशी होत असलेला खेळ उघडकीस आला आहे. किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता असून जेवणात अळ्या, किडे आणि उंदराच्या लेंड्या आढळत असल्याचा गंभीर आरोप मुलींनी केला आहे. जेवणात खराब अंडी आणि अस्वच्छ चिकनचा वापर केला जातो. दुधातही पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि पिण्याचे पाणीही अतिशय अस्वच्छ दिले जाते. एकाच प्रकारची भाजी वारंवार बनवली जाते आणि जेवणही कधीच वेळेवर मिळत नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.

जेवणाव्यतिरिक्त इतर मूलभूत सुविधांचाही वसतिगृहात पूर्णपणे अभाव असल्याचे या पत्रातून समोर आले आहे. वसतिगृहात गरम पाण्याची कोणतीही सुविधा नाही, तसेच एखादी विद्यार्थिनी आजारी पडल्यास साधी प्रथमोपचार पेटी (First Aid) देखील उपलब्ध नाही. स्वच्छतेसाठी लागणारे साहित्यही अपुरे दिले जाते. मुलींच्या अभ्यासातही वारंवार व्यत्यय येत असून स्टडी रूममध्ये (Study Room) लाईट आणि फॅनची सुविधा नाही. राहत्या रूममध्येही लाईटचा अपुरा पुरवठा आहे. याशिवाय, सिक्युरिटी गार्ड्सचे काम व्यवस्थित नसून ते मुलींमध्ये दुजाभाव करतात. सुट्टीच्या दिवशी कोणत्याही कारणास्तव मुलींना वसतिगृहाबाहेर जाऊ दिले जात नाही आणि वेळेवर बस न मिळण्याच्या अडचणींचाही सामना करावा लागतो, असे विद्यार्थिनींनी म्हटले आहे.

या निवेदनावर जीएनएम (GNM),आयटीआय (ITI), पॉलिटेक्निक आणि बीएससी (BSc) अशा विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या एकूण ३५ विद्यार्थिनींच्या स्वाक्षऱ्या आहेत.”वरील सर्व विषयांशी आम्ही सर्व सहमत आहोत,” असे नमूद करत या विद्यार्थिनींनी आपल्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या आहेत. आता महसूल आणि संबंधित प्रशासन या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन वसतिगृह प्रशासनावर काय कारवाई करते आणि मुलींची या नरकयातनेतून सुटका करते का,याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!